A2Z सभी खबर सभी जिले की

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा


सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र :
अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय जीएसटी विभागाचे विजयकुमार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, टपाल खात्याचे उपविभागीय निरीक्षक एम.एम. चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ) आश्विनी सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, शिक्षण विभागाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जनजागृती करावी. या पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रापासूनच वर्षभराचे नियोजन करावे. यात जनजागृती, पथनाट्य, रॅली आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवगत करणे तसेच यासोबत वाहतुकीचे नियम, आरोग्यबाबत मार्गदर्शन, तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आदी बाबी समजावून सांगाव्यात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) परिसरात असलेल्या बंद कारखान्यांची यादी करून तेथे पोलिसांच्या सहकार्याने तपासणी करावी. जेणेकरून अशा बंद कारखान्यांच्या उपयोग असामाजिक घटकांसाठी होणार नाही.
कृषी विभागाने शेतशिवाराच्या नावाखाली गांजा, खसखस व इतर अंमली पदार्थ वनस्पतींची लागवड तर होत नाही, याबाबत संबंधित कृषी सहायक, ग्रामसेवक व पोलिस पाटील यांना गावात अवगत करून त्याची माहिती प्राप्त करावी. पोस्ट विभागाने जिल्ह्यात येणा-या पार्सलचे स्कॅनिंग करावे. तसेच कुठेही अंमली पदार्थाची लागवड, वाहतूक व विक्री होत असल्यास याबाबतची माहिती ‘वंदे मातरम् चांदा’ या तक्रार प्रणालीचा टोल फ्री क्रमांक 18002338691, टोल फ्री क्रमांक 112 आणि चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक 1098 वर तात्काळ द्यावी. माहिती देणा-या व्यक्तिचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
यावेळी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा, पोलिस विभाग तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई, एन.डी.पी.एस. अंतर्गत अधिका-यांचे प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

AKHAND BHARAT NEWS

AKHAND BHARAT NEWS
Back to top button
error: Content is protected !!