नीड २४ न्यूज (Need 24 News)विशेष जिल्हा बातमीदार: काशिनाथ देसलेदिनांक: ६ सप्टेंबर २०२६सार्वजनिक गणेशोत्सवातील विकृती थांबवा, 'एक गाव एक गणपती' राबवा; अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे परखड आवाहनमुंबई/पुणे:"सार्वजनिक गणेशोत्सव हा अत्यंत पवित्र आणि भक्तीभावाने सुरू झालेला उत्सव आहे. मात्र, अलीकडच्या काळात या उत्सवाचे जे अवडंबर माजले आहे, ते पाहता आता हे सार्वजनिक गणपती बंद व्हायला हवेत," असे अत्यंत खळबळजनक आणि परखड मत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी व्यक्त केले आहे.
त्यांच्या या विधानामुळे सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.एका प्रसिद्ध प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी गोखले यांनी गणेशोत्सवाच्या बदलत्या स्वरूपावर तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला. पुणे आणि मुंबईतील गणेशोत्सवाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, "रस्त्याच्या मध्यभागी मंडप उभारून गर्दी केली जाते.
इतकेच नाही तर रात्रीच्या वेळी याच मंडपांच्या आडोशाला दारू पिणे, पत्ते खेळणे यांसारखे चुकीचे प्रकार घडतात. हे अत्यंत निंदनीय असून, या सर्व प्रकारांमुळे आपणच आपल्या देवाचा अपमान करत आहोत, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही."'एक गाव एक गणपती'चा दिला पर्यायबदलत्या काळातील या विकृतीला आळा घालण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा पर्याय सुचवला आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक छोटी गावे एकत्र येऊन 'एक गाव एक गणपती' ही पर्यावरणपूरक आणि शांतताप्रिय संकल्पना यशस्वीपणे राबवत आहेत. मग हीच शिस्त आणि सुसंस्कृतपणा मोठी शहरे आणि तेथील नागरिक का पाळू शकत नाहीत?
असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रियागोखले यांच्या या धाडसी विधानानंतर समाजात दोन तट पडल्याचे पाहायला मिळत आहे. सुज्ञ नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत उत्सवातील अनिष्ठ प्रथा बंद झाल्या पाहिजेत, याला दुजोरा दिला आहे.
तर दुसरीकडे, काहींनी त्यांच्या 'सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा' या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. उत्सव बंद करण्याऐवजी प्रशासनाने आणि मंडळांनी स्वतःहून शिस्त पाळली पाहिजे, असे मत विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे.उत्सवाच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांवर बोट ठेवणारे शुभांगी गोखले यांचे हे वक्तव्य आगामी काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरेल, यात शंका नाही.
