एफ.डी.सी.एम. विभागातील तिन्ही वनपरिक्षेत्र कार्यालय ‘दुपार बंद’, नागरिकांमध्ये नाराजी.

 

oplus_131072
oplus_131072
oplus_131072

अहेरी (प्रतिनिधी): प्राणहिता वन प्रकल्प अंतर्गत एफ.डी.सी.एम. (महाराष्ट्र वन विकास महामंडळ) विभागाचे आलापल्ली येथील अहेरी वनपरिक्षेत्र कार्यालय, आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय आणि फिरते पथक कार्यालय ही तिन्ही कार्यालये दुपारी १२ वाजेच्या सुमारास बंद करून थेट ३.३० वाजता सुरु केली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील तीन-चार महीण्यांपासून हे प्रकार सातत्याने घडत असून कामासाठी येणाऱ्या नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात विभागीय सहाय्यक व्यवस्थापक *अमोल केंद्रे* यांच्याशी संपर्क साधून माहिती विचारली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. कार्यालय बंद ठेवण्यासंदर्भातील कोणतेही शासन परिपत्रक आहे का, याबाबत विचारणा केली असता, “कार्यालय बंद असो की सुरु, तुम्ही काम सांगा” असे म्हणत त्यांनी प्रशासनिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

वनपरिक्षेत्र अधिकारी देखील याबाबत स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करत असून, “हे आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत, आम्हाला काही माहिती नाही” असे म्हणत जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे या कार्यालये नेमकी कोणत्या अधिकाराने आणि आदेशाने बंद ठेवली जात आहेत, हे अद्याप अस्पष्टच राहिले आहे.

सामान्य नागरिक, आणि विविध कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, कार्यालयाने सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत नियमित सुरु ठेवावे, अशी मागणी आता नागरीकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.

प्रशासकीय शिस्तीचा अभाव, जबाबदारी झटकण्याचा प्रकार आणि कार्यालयीन वेळांचे उल्लंघन यामुळे एफ.डी.सी.एम. विभागात भोगळ कारभार सुरु असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन कार्यपद्धतीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version